Tuesday 15 November 2022

प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान

दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे होते.

परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे. तो सर्वांवर प्रेम करतो.

सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गानेच गेल्यानंतर तो प्रसन्न होतो.

प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.

परमेश्वर अवतार घेत नाही. त्याने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही.

मूर्तिपूजा परमेश्वरास मान्य नाही.

सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. म्हणूनच सर्वांनी बंधुत्त्वाच्या भावनेने एकमेकांशी व्यवहार करावा.

प्रार्थना समाजाचे कार्य

प्रार्थना समाजाने अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह इत्यादी क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. श्री. आर. जी. भांडारकर व न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाचे मुख्य आधारस्तंभ होते.

न्या. रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन भारतीय जनतेत राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी विधवा विवाह मंडळ स्थापन केले.

ना. म. जोशी यांनी “सोशल सर्व्हिस लीग” स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले.

देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी “सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निर्मूलनच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे “अनाथ बालकाश्रम” काढण्यात आला. समाजाच्या गरजेच्या दृष्टीने ही भरीव कामगिरी होती.

मुलींच्यासाठी स्वतंत्र शाळा सुरु केल्या. “आर्य महिला समाज” ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था चालू करण्यात आली.

४ मे १८७३ रोजी प्रार्थना समाजाने “सुबोध पत्रिका” हे त्यांचे मुखपत्र सुरु केले होते. या मुखपत्रातून सामाजिक व राजकीय विचार मांडले जात होते.

मजुरांच्यासाठी पहिली रात्रशाळा मुंबईमधील चेऊलवाडी येथे भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकाराने इ. स. १८७६ मध्ये काढण्यात आली होती. त्यानंतर मुंबईच्या इतर भागात देखील रात्रशाळा काढण्यात आल्या.

इ. स. १८९० रोजी मुंबईतील मदनपुरा येथे अस्पृश्यांसाठी शाळा काढण्यात आली.

इ. स. १८७६-७७ च्या दुष्काळाच्या वर्षी प्रार्थना समाजाने दुष्काळ पीडितांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले होते. अशा रीतीने प्रार्थना समाजाने एक भरीव सामाजिक कार्य केल्याचे आढळते.

प्रार्थना समाजाची तत्वे पटवून देण्यासाठी, या समाजाबद्दल लोकांना असलेल्या निरनिराळ्या शंकाचे निरसन करण्यासाठी न्या. रानडे यांनी “एकेश्वरनिष्ठांची कैफियत” हा विचार प्रवर्तक ग्रंथ लिहीला.

प्रार्थना समाजाच्या कार्याचे मूल्यमापन

प्रार्थना समाजाला चांगले नेतृत्व लाभूनही ठराविक शहरापुरतेच त्याचे कार्य पोहचू शकले. त्याचे कारण म्हणजे त्यातील सुधारक मिशनऱ्यांचे अनुकरण करीत होते. त्यामुळे हिंदूना त्यांच्या कार्याविषयी कधीच आपुलकी वाटली नाही.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...