Thursday 21 May 2020

टाळेबंदी काळात कार्बन उत्सर्जनात भारतात २६, तर जगात १७ टक्के घट

- करोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण जगात १७ टक्क्य़ांनी कमी झाले असून भारतात ते २६ टक्क्य़ांनी घटले आहे. एप्रिल २०१९ व एप्रिल २०२० मधील कार्बनच्या प्रमाणाची तुलना करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

- ब्रिटनमधील नॅशनल क्लायमेट चेंज या नियतकालिकाने म्हटले आहे, की कार्बन उत्सर्जनात टाळेबंदीमुळे जानेवारी ते एप्रिल या काळात जगभरात २०१९ च्या पातळीपेक्षा मोठी घट झाली आहे. ती या वर्षअखेरीपर्यंत ४.४ टक्के ते ८ टक्के राहील.

- दुसऱ्या महायुद्धानंतर कार्बन उत्सर्जनात प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. टाळेबंदीचा हा परिणाम असून २०२० मध्ये कार्बन उत्सर्जनात सर्वाधिक निव्वळ वार्षिक घट नोंदली जाण्याची शक्यता आहे.

- भारताशिवाय ब्रिटन- ३०.७ टक्के तर अमेरिका ३१.६ टक्के याप्रमाणे घट नोंदवली गेली आहे. चीनमध्ये २३.९ टक्के घट नोंदवली गेली आहे. ७ एप्रिलला टाळेबंदीचा सर्वोच्च काळ असताना दिवसाला कार्बन उत्सर्जन सतरा टक्के कमी झाले, याचा अर्थ जगात १७ दशलक्ष टन कार्बन कमी सोडला गेला. ही कार्बन उत्सर्जन पातळी २००६ मधील पातळीशी जुळणारी आहे.

- रस्ते वाहतुकीतून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनात ४३ टक्के, ऊर्जानिर्मितीमधील कार्बन उत्सर्जनात १९ टक्के, उद्योग व हवाई वाहतुकीतील कार्बन उत्सर्जनात अनुक्रमे २५ व १० टक्के घट नोंदली गेली आहे. २०२० अखेरीस कार्बन उत्सर्जनातील घट ४ ते ७ टक्के राहील असा अंदाज आहे.

- या अभ्यासात असे म्हटले आहे, की हे कार्बन उत्सर्जन कमी झाले असले तरी त्याचा हवामान बदलांवर फारसा परिणाम होणार नाही कारण ही घट फार किरकोळ आहे. आधीच मोठय़ा प्रमाणावर कार्बन वातावरणात साठलेला आहे. संशोधनाचे प्रमुख लेखक कॉरिनल क्वीयर यांनी म्हटले आहे. टाळेबंदीमुळे ऊर्जेचा वापर कमी झाला, त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी झाले आहे. त्यातून कुठलाही रचनात्मक बदल सूचित होत नाही.

No comments:

Post a Comment