Wednesday 6 May 2020

लॉकडाउनमुळे गावातील लोकसंख्येत ७ टक्क्यांनी वाढ

लॉकडाउनंतर गावातील लोकांचं शहराकडे येणं बंद झालं आहे आणि गावातील लोकसंख्येत वाढ झाल्याची नोंद सीपीआर या संस्थेनं केली आहे.

सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (सीपीआर) या संस्थेने केलेल्या अभ्यासात शहरातील लोकसंख्येत जवळपास ११ टक्क्यांची घट झाल्याचं समोर आलं आहे. तर गावातील लोकसंख्येत ७ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. लॉकडाउनमुळे लोकांचं गावाकडून शहरात होणार अप-डाउन बंद झालं आहे, असंही या अहवालात समोर आलं आहे.

'लॉकडाउनमुळे लाखोंच्या संख्येनं गावाकडील लोक शहरात येणं आता बंद झालं आहे. यामुळे शहरानजिकच्या गावांमध्ये लोकसंख्येत वाढ झाली आहे. यात राजस्थानचा पश्चिम भाग, ओडिशा येथे सर्वाधिक स्थलांतरणाचं प्रमाण आढळून आलं आहे. प्रवासी मजुरांनी केलेलं पलायन हे यामागचं कारण असू शकतं', असं सीपीआर संस्थेचे वरीष्ठ अधिकारी पार्थ मुखोपाध्याय यांनी सांगितलं.

लक्षवेधी बाब अशी की जास्त लोकसंख्या असलेल्या आणि गरीब राज्य म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्येत जास्त वाढ झालेली नाही. या राज्यांमधून मोठ्या संख्येने लोक इतर राज्यांमध्ये जात असतात. लॉकडाउमुळे रेल्वेसेवा बंद आहे. त्यासोबतच राज्यांच्याही सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमधील लाखोंच्या संख्येने लोक इतर राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. मजुरांसाठी रेल्वे सुरू करण्यासाठीची परवानगी देण्यात आल्याने येत्या काळात या आकडेवारी लक्षणीय बदल दिसू शकतो.

No comments:

Post a Comment